परिवहन मंत्र्यांचा आदेश बापाच्या अश्रूंना न्याय; २४ तासाच्या आत बदली ! परंतु असे अनेक कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत त्यांचे काय? MSRTC Transfer News
कोल्हापूर, दि. १८ एप्रिल :
MSRTC Transfer News : शासनव्यवस्थेत संवेदनशीलता आणि तत्परता एकत्र आली, तर सामान्य माणसाच्या आयुष्यात आशेचा किरण कसा निर्माण होतो, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय कोल्हापूर-सांगली मार्गावर पाहायला मिळाला. एका वृद्ध वडिलांनी आपल्या मुलाच्या बदलीसाठी थेट परिवहन मंत्र्यांचा ताफा अडवला आणि पुढे घडलेली घटना प्रशासनातील मानवतेचा जिवंत दाखला ठरली.
रुकडी फाट्यावर काही ग्रामस्थांसह उभे असलेले नायकू गवाणे यांनी आपल्या मुलगा, एसटी चालक अमोल गवाणे, याच्या बदलीसाठी कळकळीची विनंती केली. उतारवयात आधारासाठी मुलगा जवळ असावा, ही साधी पण भावनिक अपेक्षा त्यांनी मंत्र्यांसमोर मांडली.
ग्रामस्थांनी हात दाखवताच परिवहन मंत्री यांनी ताफा थांबवण्याचे आदेश दिले. भर उन्हात गाडीतून उतरून त्यांनी स्वतः त्या वृद्ध बापाची व्यथा ऐकून घेतली. त्या क्षणी सत्तेपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची ठरली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे स्पष्ट निर्देश दिले—“ताबडतोब बदलीचे आदेश काढा.” विशेष म्हणजे, दुपारी दिलेल्या आदेशाची पूर्तता सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आली आणि संबंधित विभागाला बदली आदेश प्राप्त झाला. MSRTC Transfer News
दरम्यान, खासदार यांनीही पत्र व दूरध्वनीद्वारे या प्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यांनी अमोल गवाणे यांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन सिंधुदुर्ग विभागातून कोल्हापूर विभागात बदली करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून अखेर अमोल नायकू गवाणे यांची बदली कोल्हापूर विभागात केली.
या घटनेमुळे एका वडिलांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळले, तर प्रशासनाविषयीचा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. “मानवतेला दिलेला मानच खरा सन्मान असतो,” याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे.
अशा दुसऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे काय? MSRTC Transfer News
दरम्यान, अशाच प्रकारे अनेक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकडून बदलीसंदर्भात वर्षानुवर्षे अपेक्षा व्यक्त होत आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या 10-10 वर्षापासून बदल्या रखडल्या आहेत अनेक वृद्ध आई-वडील आपल्या मुलांच्या जवळ राहण्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत परिवहन मंत्री बाकी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का अशा भावना व्यक्त होत आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




