आठवड्यात ४८ तास काम राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत, ३–४ दिवस सुट्टीची शक्यता. Maharashtra New Labour Code
मुंबई : Maharashtra New Labour Code : राज्य सरकार लवकरच नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. विकसित देशांप्रमाणे “आठवड्यात ४८ तास काम करा आणि त्यानंतर सुट्टी घ्या” ही पद्धत राज्यात लागू करण्याचा विचार सुरू आहे.
या प्रस्तावानुसार, कामगारांनी आठवड्याचे ४८ तास काम तीन किंवा चार दिवसांत पूर्ण केले, तर त्यांना उर्वरित तीन किंवा चार दिवस भरपगारी सुट्टी मिळू शकते. मात्र, कामाचे तास कसे ठरवायचे याबाबत कामगार आणि मालक यांच्यात परस्पर संमती आवश्यक राहील.
दररोज ८ ते १२ तासांची लवचिकता
सध्या देशात दररोज ८ तास आणि आठवड्याला ४८ तास कामाची मर्यादा आहे. राज्य सरकारने दररोज कामाची कमाल मर्यादा १२ तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, कामगार संघटनांनी त्याला विरोध केल्याने अंमलबजावणी झाली नव्हती.
आता केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार आठवड्याचे ४८ तास काम बंधनकारक राहील; पण हे तास कोणत्या दिवशी आणि किती तासांत पूर्ण करायचे, याबाबत लवचिकता दिली जाईल.
वेतन न दिल्यास ५० हजारांचा दंड. Maharashtra New Labour Code
वेतन संहितेत सुधारणा करताना राज्य सरकारने महत्त्वाची तरतूद केली आहे. कामगारांना ठरलेले वेतन न दिल्यास संबंधित मालकावर ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.
केंद्राच्या संहितेत कारावासाची शिक्षा होती; परंतु शिक्षा झाल्यास उद्योगपतींच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, या कारणाने राज्याने कारावासाऐवजी दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांसाठी रात्रपाळीची मुभा
सामाजिक सुरक्षा संहितेनुसार महिलांना रात्रपाळीत काम करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मालकावर राहील. कामाच्या ठिकाणी पाळणाघर (क्रेच) सुविधा देणे बंधनकारक असेल.
सणासुदीला दुप्पट बोनस
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये अतिरिक्त काम करावे लागते. अशा वेळी कामगारांना दुप्पट बोनस देणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.
लॉकआऊटसाठी कामगार मर्यादा वाढणार
कारखाना बंद (लॉकआऊट) करताना पूर्वी किमान १०० कामगारांची मर्यादा होती. ही मर्यादा वाढवण्याचा विचार आहे.
धोकादायक आस्थापनांसाठी विमा कवच. Maharashtra New Labour Code
धोकादायक उद्योगात एकच कामगार असला तरी त्याला विमा संरक्षण देणे बंधनकारक राहील. तसेच औद्योगिक संहितेनुसार कंत्राटदारांनाही ‘मालक’ म्हणून जबाबदार धरले जाईल.
४० दिवसांत हरकती मागवणार
या प्रस्तावित सुधारणांवर कामगारांकडून ४० दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यावर राज्यात नवीन कामगार संहिता लागू होईल.
मंत्र्यांचे स्पष्टीकरण. Maharashtra New Labour Code
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले की,
“दररोज ८ किंवा १२ तास काम करणे बंधनकारक नाही. खासगी क्षेत्रातील कामगारांनी आठवड्यात ४८ तास काम करणे आवश्यक आहे. हे तास कधी आणि कसे पूर्ण करायचे, हे कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरेल.”
नवीन संहितेमुळे कामगारांना लवचिक कामपद्धती मिळण्याची शक्यता आहे; मात्र कामगार संघटनांची भूमिका आणि अंतिम अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .





